चारुशीला-14
चारुशीलाने (Charushila)झोपडीत डोकावून पहिले…आत कोणीच नव्हते. ती परत माघारी फिरणार तोच तिची नजर समोरच्या भिंतीवर गेली.
कोणाचा तरी फोटो होता. हार घातलेला. कदाचित गोधुमावशीचा नवरा असावा. कोपऱ्यात एक पत्र्याची जुनी पेटी होती. ती परत माघारी फिरणार तोच गोधुमावशी काहीतरी बडबडत येताना दिसली. तिने चारूला पहिले आणि पळतच झोपडीकडे आली. पटकन आत गेली आणि भिंतीवरचा फोटो काढून तिने तो कवटाळून घेतला.
“जा तू जा इथून, निघून जा परत इथे राहू नकोस “ असं पुटपुटायला लागली. “काय झाले गोधुमावशी “ चारूने तिचा हात पकडला. तसा तिने तिचा हात झिडकारला. आणि कोपऱ्यात पत्र्याच्या पेटीशेजारी जाऊन बसली.“गोधुमावशी मला सांगा ना तुम्ही मला येथून का जायला सांगत आहात.”
“रक्ताने बरबरटलेले घर आहे ते. तू तिथं राहू नकोस. माझा हसत्या खेळत्या संसाराचे पार वाटोळे केले त्या घराने “काय बोलताय मावशी मला काहीच कळत नाही “ कळले तर मला पण नव्हते ग ‘ नक्की माझ्या नवऱ्याने काय केले होते.
कारखान्यातले सगळे पैसे लुबाडून एवढे मोठे घर बांधले ‘ आणि आरोप घेतला माझ्या नवऱ्यावर. तडपूण तडपून मेला माझा नवरा तुरुंगात. “ गोधू मावशी हुंदके देऊन रडत होती. म्हणजे तुम्ही मला तो पेपरचा गोळा दिला होता. त्या पेपरमध्ये बातमी होती. ती खरी होती?
चारुशीला एकदम बोलली. ती बातमी बरोबरच होती पण अडकवल मात्र माझ्या नवऱ्याला. पहिली बायको पोटूशी असताना तिला मारून टाकलं. सुशीला बरोबर लग्न केलं.सुशीला ला सगळं ठाऊक होतं. परंतु ती सुद्धा गप्प बसली. पण तो वरचा आहे तो पाहतोय सगळं. गेली तिच्या कर्माने.
असं म्हणून तिने पत्र्याची पेटी उघडली. आतमध्ये गोधू मावशीच्या नवऱ्याचे बूट, एखादा ड्रेस, पैशाचं पाकीटआणि टोपी होती. गोधू मावशी ढसाढसा रडत होत्या. गोधू मावशी तुम्हाला सगळं आठवतंय, इतकं सगळं छान बोललात मग तुम्ही असं वेड्यासारखं का वागताय.
“ वेड्याच सोंग घेतलय म्हणून तरी जगता येतय. शहाणं बनून जगलं की जीव नकोसा होतो.” गोधू मावशीचे हे शब्द चारुशीलाचे काळीज चरकन कापून गेले.पोरी राहू नको त्या घरात शापित घर आहे ते. निघून जा. गोधू मावशी कळवळीने सांगत होत्या. नुकताच लग्न झालेल्या नव्या नवरी च्या हे सगळे आकलना बाहेरचे होते.
तू मला भेटायला आलीस हे कोणालाही सांगू नको. नाहीतर तुझा ही जीव जायचा. येते गोधु मावशी काळजी घ्या. असं म्हणून चारुशीला उठली. थांब पोरी असं म्हणत तिने एक छोटी देवीची मूर्ती चारुशीला च्या हातात दिली. कायम जवळ ठेव. आणि शक्य तितक्या लवकर तुझ्या आई-वडिलांकडे निघून जा.
चारुशीला जड अंतकरणाने बाहेर आली. वहिनीसाहेब किती उशीर केला. चला लवकर घरी. पवन साहेबांना कळले तर माझी नोकरी जाईल असं म्हणत ड्रायव्हरने गाडी चालू केली. गोधू मावशी चे शब्द चारुशीलाच्या डोक्यात घुमत होते. आई-वडिलांच्या घरी निघून जायचे. पण काय कारण सांगून. सासरची माणसे इतकी जीव लावतात. माहेरी जाण्यासाठी काहीतरी कारण तर पाहिजे.
गोधू मावशीच्या नवऱ्याची गोष्ट मात्र तिच्या कानात घुमत होती. संपतराव असे काहीतरी कुणाबरोबर वागतील याच्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती एकदम विचारात हरवलेली होती. वहिनीसाहेब घर आलं. असे ड्रायव्हरने म्हणताच चारुशीला भानावर आली.
आता करू तर काय करू? गोधू मावशीने सांगितलेले सगळे विसरून जाऊन सुखी संसाराला सुरुवात करू कि गोधू मावशी ने म्हटल्याप्रमाणे ही शापित घर सोडून जाऊ. रात्री आपल्याला बाकड्यावर बसलेल्या ज्या दोन बाया दिसतात. त्या कोण? आपल्या खोलीतली वस्तूंची आदलाबदल होते ती कशी? असे असंख्य प्रश्न तिच्या मनात येत होते.
ह्या सगळ्यामध्ये जर आपल्याला पवनची साथ पाहिजे असेल तर त्याला हे सगळे सांगणे गरजेचे होते. कदाचित त्याला ठाऊकही असेल परंतु ते अर्धसत्य कोण आपल्या मुलाला सर्व सांगेल. घरात आली तेव्हा घरात कोणीच नव्हते. तिने अवंतिकाच्या खोलीत डोकावून पाहिले. तिथे रुक्मिणी मावशी आणि अवंतिका हळूहळू काहीतरी बोलत होत्या. चारुशीला ला पाहताच दोघेही गप्प बसल्या.
क्रमश….
खूप छान लिखाण सुमे 🥰🥰