आई |Mother

गोष्ट आहे एका आईची (mother).आज विनायक रावांच्या घरात खूप आनंदी वातावरण होते.

मध्यंतरीच्या काळात त्या परिवाराने दुःखद काळ अनुभवला होता . खरे तर भातखंडे परिवार म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती मध्ये मोडणारा.विनायक रावांना तिन मुले. दोन मुलांची लग्ने झाली आणि तिसरा मुलगा श्रीधर चे लग्न करायचे ठरले. त्या वेळी मात्र परिस्थीती थोडी वेगळी होती. कारण लीला ताई म्हणजेच विनायक रावांची पत्नी थोडी आजारी पडली. पण त्यांचा श्रीधर वर खूप जीव होता. त्यामुळे त्यांनी हट्टच धरला की आता मुलगी बघायचीच.विनायक रावांचे समाजात तसे जाणे येणे असायचे. त्यामुळेच त्यांच्याच नात्यात असणाऱ्या रघुनाथरावांनी श्रीधर साठी एक स्थळ आणले .रघुनाथ रावांच्या पत्नी विमलाबाई यांची भाची लग्नाची होती त्यामुळे त्यांनी मीनाक्षीसाठी श्रीधरच स्थळ सुचवलं .इकडे विनायक रावांच्या घरातही आनंदाचे वातावरण होते.मुलगी बघायला जायचे म्हणून पहिल्या दोन्ही सुना ,मुले आणि लीलाताई ही त्यांची तब्येत बरी नसतानाही त्या हट्ट करून गाडीत निघाल्या. मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला .श्रीधर ने तिथेच होकार दिला .त्यानंतर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम रविवारी करायचा असं ठरलं आणि तो कार्यक्रम रघुनाथ रावांच्या घरी करायचा होता .त्याप्रमाणे विनायक रावांनी मुलीकडच्या लोकांना आमंत्रण दिले .इकडे मोठ्या दोन्ही सुनांची खूप तयारी चालू होती कार्यक्रमासाठी .पण काय माहिती लीला ताईंची तब्येत फारशी बरी नव्हतीच.

सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला जेवणे झाली आणि आता लग्नाची तारीख काढू म्हणून बैठक बसली. खूप वेळ न करता लवकरच तारीख काढूयात असं सगळ्यांचं मत ठरलं त्याप्रमाणे मे महिन्याची तारीख काढली गेली .आता राहिले दोन अडीच महिनेच आपल्याला तयारीला लागायला पाहिजे असं म्हणून मुलाकडच्या आणि मुलीकडच्या घरामध्ये एक प्रसन्नतेच वातावरण होते.पण विनायक रावांच्या दोन्ही सुनांना थोडीशी काळजी वाटत होती आपल्या सासूबाईंचीच. म्हणजे लीलाताई या तशा कणखर असल्या ,खंबीर असल्या तरी आता शरीर कुठेतरी खंगत चालले हे त्यांना तितकंसं मान्य नव्हतं ,त्यामुळे त्या खूप उत्साह ओढून ताडून आणत होत्या पण त्याला शरीर साथ देत नव्हतं.

लग्नाच्या गडबडीमध्ये आता दवाखान्या नको असं म्हणून त्यांनी दुखणं अंगावर काढलं.लग्नाला एकच महिना राहिला होता .घरामध्ये गडबड चालू, होती खरेदी चालू होती. दोन्ही सुना एकमेकींच्या सल्ल्याने, लीला ताईंच्या विचाराने चालत होत्या. पण या उत्साहात लीला ताई कुठेतरी मागे होत्या ,कारण मनाने जरी त्या उत्साहीत असल्या तरी शरीर त्यांना साथ देत नव्हते आणि याचं दुःख त्यांना आणि विनायक रावांना खूप वाटत होते .दोन्ही मुलांनाही आईची ती उणीव कुठेतरी जाणवत होती. अशातच एका सकाळी विनायक राव नेहमीप्रमाणे लीला ताईंना हाक मारत होते “अग उठ ना सहा वाजले ना “पण लीलाताईनी प्रतिसाद दिला नाही.विनायक रावांना वाटले की झोप लागली असेल तिला म्हणून ते फिरायला गेले.

सकाळचे फिरून आले, सात सव्वासात वाजले होते. त्यांनी परत रूम मध्ये डोकावून पाहिलं तरी लीला ताई झोपलेल्या त्यांना दिसल्या, म्हणून त्यांनी हाताने त्यांना हात हलवून उठवण्याचा प्रयत्न केला असता लीला ताईंनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. विनायक रावांना जे समजायचं ते समजलं. त्यांनी दोन्ही मुलांना बोलावून घेतलं आणि सगळे जमले .घरामध्ये अचानक एक वेगळच वातावरण तयार झालं. मुलांनी रडत रडत डॉक्टरांना फोन केला ,डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी जाहीर केलं की त्या झोपेतच गेल्यात .दोन्ही सुना मुलं नातवंड सगळे रडायला लागले .अशा वेळेस विनायक रावांनी धीर एकवटला. त्यांनी शक्य आहे तेवढ्या नातेवाईकांना त्यांना फोन केले. मीनाक्षीच्या घरचे लोकही आले. आणि बघता बघता पंधरा दिवसाचा तो काळ गेला. दुःख सांत्वन या पलीकडे सगळ्या गोष्टी होत्या पण परिस्थितीला आता सामोरे जायचं होते .लग्नाची तारीख पुढे ढकलायची का असा विचार करून सगळेजण विचार करायला लागले ,गावाकडून आलेल्या वयस्कर लोकांनी सल्ला दिला की सव्वा महिना झाला की लग्नाची तारीख काढा आणि छोटेखाणी लग्न पार पाडा .त्याप्रमाणे सव्वा महिना नाही पण एक साधारण दोन महिने झाल्यानंतर साधेपणाने लग्न झालं आणि मीनाक्षी या घरात लक्ष्मीच्या रूपात आली.

ती जशी आली तशी एक कावळा रोज स्वयंपाक खोलीच्या खिडकीत यायचा आणि मीनाक्षी तिथे स्वयंपाक करत असली की तो काव काव करायचा. मीनाक्षी रोज त्याला काही ना काही जे बनवलेला असेल ते तिथे खिडकीत ठेवायची. ते खाऊन तो कावळा जायचा .सगळ्यांना आश्चर्य वाटलं की आईला जाऊन दोन महिने झाले हे असं कधीच घडलं नाही आणि आता मीनाक्षी आल्यानंतर हे काय चालू झालं. विनायक रावांनाही या गोष्टीवर विश्वास होता की पित्र हे कावळ्याच्या रूपात येतात आणि नैवेद्य खाऊन जातात .असं होता होता महिने झाले आणि आज मीनाक्षीला सकाळपासूनच कोरड्या उलट्या चालू झाल्या तिला स्वयंपाक खोलीतही जावसं वाटत नव्हतं .अन्न पाण्याचा वासही तिला स्वस्थ बसू देत नव्हता. असं का होतंय हे तिने विचार केला, त्यावेळेस तिच्या लक्षात आलं अरे ह्या महिन्यात तर आपण बाजूलाच नाही बसलो .काहीतरी गडबड आहे, तिने हळूच श्रीधरला ही गोष्ट सांगितली .घरात मोठं कोणी नाही, श्रीधर नी मग मोठ्या वहिनीलाच म्हणजे आपल्या दादाच्या बायकोला ही गोष्ट सांगितली. मग रेवती मीनाक्षीला घेऊन दवाखान्यात गेली आणि डॉक्टरांनी ती आनंदाची बातमी दोघींना सांगितली. दोघीही घरी आल्या, खरंतर एक प्रकारचा आनंद होता पण लीलाताई या आनंदात सहभागी नाहीत या गोष्टीचे दुःख ही सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

आता मीनाक्षीला दोन महिने झाले आणि हळूहळू ती पुन्हा स्वयंपाक घरात यायला लागली .तसा तो कावळा पुन्हा खिडकीजवळ यायला लागला. मीनाक्षी त्याला त्याला नैवेद्य ठेवू लागली.दोन दिवस गेल्यानंतर तो कावळा यायचा बंद झाला. जरी मीनाक्षी किचनमध्ये असेल तरी तो कावळा येत नव्हता. मीनाक्षीला चुकल्यासारखं वाटायचं , त्या रात्री ती झोपली असता मध्यरात्री तिला एक स्वप्न पडले ,स्वप्नात लीला ताई आल्या होत्या ,”मीनाक्षी तू किती छान आहेस ग सगळ्या घराला बांधून ठेवलेस .संस्कारक्षम आहेस तू .रोज तुझ्या हातून मला भरवतेस मला खूप छान वाटते .असेच लाड पुरवून घ्यायला मी येणर आहे परत” असं म्हणत असतानाच मीनाक्षीला जाग आली. हे आपण स्वप्न बघतोय का असा तिला प्रश्न पडला. त्यानंतर तो कावळा कधीच त्या खिडकीत आलाच नाही. दिवस असेच पुढे जात होते .बोलता बोलता मीनाक्षीला सातवा महिना लागला आणि आता तिला बाळंतपणासाठी माहेरी जायची वेळ आली. दोन्ही जावांनी तिचे सगळे डोहाळे पुरवायला कुठेही कमतरता केली नाही .सातव्या महिन्यामध्ये मीनाक्षीची आई मीनाक्षीला घ्यायला आली आणि तिचे डोहाळे जेवण आम्हीच करतो त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या असं आमंत्रण तिने दिले. मीनाक्षी सासर हून माहेरी गेली आणि पंधरा दिवसांनी हे सगळे लोक डोहाळे जेवणासाठी मीनाक्षीच्या माहेरी गेले . यथासांग डोहाळे जेवण पार पडले सगळे लोक परत आले .आणि आता मीनाक्षीच्या बातमीची सगळेजण वाट पाहत होते आतुरतेने .तो दिवस उजाडला ,सकाळी श्रीधर चा फोन खणखणला आणि मीनाक्षीच्या वडिलांनी ती आनंदाची बातमी दिली. “लक्ष्मी आली हा तुमच्या घरी “असं त्यांनी सांगितलं. मीनाक्षीला जेव्हा हे कळलं त्यावेळेस मीनाक्षी मनातून अतिशय समाधानी झाली होती. कारण त्या स्वप्नाचा संदर्भ तिने कुठेतरी या गोष्टीची लावला होता.

सगळे लोक बघायला आले आणि येताना त्यांनी सगळं व्यवस्थित काही बाळ बाळंतिणीसाठी आणायचं ते सगळं घेऊन आले. आता मीनाक्षी माहेरी राहत होती .एका रात्री बाळ अचानक खूप रडायला लागले.मीनाक्षी च्या आईला आजीला काहीच कळत नव्हतं की बाळ का रडते. डॉक्टर कडे नेलं, तपासलं पण तरी डॉक्टर म्हटले घाबरण्याचं कारण नाही पण ती का रडते कळत नाही. पोट व्यवस्थित भरत होते तरी असे का व्हावे?आणि मग मीनाक्षीला कळलं की आपल्याला जे स्वप्न पडलं होतं ते स्वप्न सत्यात उतरलेले आहे .मीनाक्षी ने सांगितलं घरात, देवापुढे माफी मागितली आणि “सासुबाई तुम्ही आहात ना मग माझ्याकडून सेवा करून घ्यायची असेल तर तुम्ही शांत व्हा “ती एवढेच बोलली आणि त्या क्षणी बाळ रडायचं थांबलं. आता सव्वा महिना उलटून गेला दीड पावणे दोन महिने झाले. आता विनायक रावांनी घरात सांगितले की आता बाळ बाळंतीनीला आपल्या घरी आणायला हवे.त्याप्रमाणे श्रीधरणे मीनाक्षी ला फोन केला की आम्ही आता तुम्हाला घ्यायला येतोय .लीलाताई गेल्यामुळे वर्षभर या घरात शुभ कार्य करू नये असं सगळ्यांचं मत पडले आणि पहिलंच बाळंतपणा असल्यामुळे बारसे ही मीनाक्षीच्या माहेरीच करायचं ठरलं. पण यावेळेस विनायक रावांनी एक अट घातली ,”जरी बारसं तुम्ही करणार असाल तरी आम्ही खर्च देणार आहोत कारण ते बाळ आमचं पण आहे”. “तुम्ही सगळा खर्च कशासाठी उचलता”? असं म्हणून मीनाक्षीच्या वडिलांना विनायक रावांनी सांगितलं. बारशाचा दिवस ठरला आता आत्या म्हणून श्रीधरची चुलत बहीण आली होती नाव काय ठेवायचं ?नाव काय ठेवायचं? असं सगळा एकच गोंधळ चाललेला होता .श्रीधरला आणि मीनाक्षीला विचारले की तुम्हाला कुठले नाव आवडेल? त्यावेळेस मीनाक्षी ने सांगितले ,”लीला “हेच नाव मला ठेवायचे. कारण ते मला अतिशय आवडतं. सगळे आवाक झाले. विनायक रावांना खूप आनंद झाला त्यांच्या डोळ्यात क्षणभर पाणी आले. आणि श्रीधर चा आनंद गगनात मावत नव्हता. आपली मुलगी आईच्या रूपात आपल्याला परत भेटते ही गोष्ट त्याच्या मनाला खूप सुखद वाटत होती .आणि छोट्या बाळाच्या आत्याने तिच्या कानात लीला म्हणून आवाज केला आणि सगळ्यांनी त्या तिच्याच्या पाठीत धपाटे मारले. खरंच त्याच्यावरती जीव असतो त्याच्याकडेच माणूस पुन्हा हक्काने जातो त्याप्रमाणे लीलाताई परत विनायक रावांच्या आयुष्यात नातीच्या रूपात आल्या…

Leave a Comment